
🌷" भाग्यवान मी "...
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
भारतीय संस्कृतीमध्ये, सणांची भरपूर रेलचेल…
सणांशिवाय सामान्य-जनांची, होणार घालमेल…
भावा-बहिणीच्या मायेचं एकमेव प्रतिक राखी…
नारळी पौर्णिमेला पंच पक्वान्नांची गोडी चाखी
भाऊरायाची-सागराची यथास्त पूजा करायची…
त्यांच्या उदंड आयुष्य-यशाची प्रार्थना व्हायची
बहिण भावाच्या घरी जाऊन होतो हा सोहळा…
दोघांच्याही मनांत, एकमेकाबद्दल सदैव लळा
काही नाती, सकृतदर्शनी सौम्य अशी वाटतात…
पण कोमल भावना खोलवर परिणाम करतात
या पवित्र नात्यामध्ये दिखावा अजिबात नसतो…
पण कृतीमधून, आपलेपणा पूरेपूर दिसून येतो
नि:स्वार्थ, निष्कपट, अतूट-प्रेम, बहिण-भावाचं…
असं पवित्र नातं जगभरात ना शोधून मिळायचं…
अस्मादिक सहा भावांची छोटी-बहीण लाडकी…
त्यामुळे शाळेत, मैत्रिणीत खूपच भाव खायची…
सहाही भावांकडून फक्त लाडच लाड व्हावयाचे…
म्हणून रक्षाबंधन-भाऊबीज-सण फार महत्त्वाचे
कालवशात, आज माझे तीनच बंधू असले तरी…
मज-स्मृतीत दोन्ही सणांना सर्व भावांची हजेरी…
मन-आत्मा-देह या सर्वच स्तरांवर घासून-पुसून,
जाणवते मजला,"भाग्यवान मी" फिरून-फिरून…
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆















