झाडा-झाडातून वारा येई वाजवीत शीळ कोणी टाकली, चमकत्या आभाळी नीळ ? नकळत मनोमनी कोणी ही घातली भूल ? कोण जाणे राधेला असं कसं लागंलं खूळ ?
ऐकूनी श्री हरिची मधुर मुरली, प्रेम-वेडी राधा घर-दार विसरली... जणू तहान-भूकही सारी सरली नकळत अलगद देहभान हरपली...
सहज अवखळ राधा-राधा-राधा, "धारा-धारा-धारा" बनली...
जुळले-जुळलेसे वाटती, नाजूक कोमल धागे... कोण असे तो वीणकर, काहीच कसे न उमगे ? हा भास, स्वप्न कीं सत्य, का ना कुणी मज सांगे ? बिंब दिसे प्रति-बिंबा, चाहूल कशी मग न लगे ?
कातरवेळ झाली अन् लागते अनावर ओढ ... जणू वेडया राधेची, खट्याळ कान्हा काढी खोड सांज-लालीमा पसरुनी, गाली दिसतसे गोड ... द्वैत आणि अद्वैताची, अद्वितीय अशी ही जोड
Leave a Reply