कविता -🌷 " प्रेमाने जिंकता येते "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
संपूर्ण श्रावण मास म्हणजे जणू, सणांची ही खैरात
पाचव्याच दिवशी होई, नागपंचमी-सणाने सुरूवात
सणांचा-उत्सवांचा-आनंदाचा-उत्साहाचा हा महिना
हिरवा-कंच शेला पांघरुन उधळी निसर्गरम्य खजिना
हिंदू-संस्कृतीत, प्राणी-व-पक्षी यांनाही मानाचे स्थान
देवाधिदेव श्रीशिव-व-विष्णु यांकडून नागांचा सन्मान
शेषशायी-विष्णु, महादेवाने गळ्यात"वासुकी" धारण
जणू ठळकपणे संदेश दिला की"करावे नागांचे रक्षण"
प्राचिन काळापासून"नागदेवता-प्रसन्न"करण्याची प्रथा
गावोगावी स्त्रिया देवळात-वारुळा जवळ करती पूजा
झिम्मा-फुगडी,फेर धरून गातात नाग-पंचमीची गाणी
उंच झोका घेती-हा सण स्त्रियांसाठी आनंदाची पर्वणी
मानवी-जीवनात भूतदया-सहिष्णुता यांचे खूप महत्व
म्हणूनच संपूर्ण श्रावण महिन्यात शाकाहाराचेच तत्व
उपद्रवी कीटक, उंदीरादी हानीकारकांवर उदर-निर्वाह
शेत-कामात महत्त्वाचा कार्यभाग साधून, देई हातभार
अशी शेताची निगा राखतो म्हणून "क्षेत्रपाल"असे नाव
शेती-प्रधान-देश-मंत्र, सापांना मारण्यास पूर्ण मज्जाव
प्रत्येक सण आपणांस देत असतो महत्त्वपूर्ण शिकवण
"प्रेमाने कोणासही जिंकता येते"सांगे नागपंचमीचा सण
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply