कविता – 🌷 ” सहजच उचलू मेरु-पर्वतही “


कविता - 🌷 " सहजच उचलू मेरु-पर्वतही "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

नरक-चतुर्दशीला, खूप नावांनी ओळखतात
रूप-चतुर्दशी-काली-चौदस असंही म्हणतात
विविध नावांनी आनंदोत्सव साजरा करतात
दरवर्षी शोषणकर्त्या-दुष्टालाच जणू मारतात...

कृष्ण-सत्यभामानी मध्यरात्री याच तिथीला,
क्रूर -दुराचारी अशा नरकासुराचा वध केला...
मुक्त केलं, छळवणूकीने ग्रासलेल्या प्रजेला...
सूर्योदय-होण्याच्या आधीच क्रूरात्मा-वधला...

भुदेवीच्या रूपे सत्यभामा कृष्णास साथीला
अशारितीने शूरवीर-द्वयीने मारून राक्षसाला,
बंदिवासातील सोळा सहस्र बंदिवान-अबला
बंदिगृहातून-घोर अत्याचारांतून,  मुक्त केल्या

श्रीकृष्णानेच, दुराचाराला संपूर्ण विराम दिला...
ब्रह्म-मुहूर्ती सचैल-स्नानाने तो शुचिर्भूत झाला...
तिन्ही लोकी सर्वांनी आनंदाचा जल्लोष केला...
हा दिवस-"छोटी-दिवाळी"म्हणून साजरा केला...

असुर-वध-स्मृती म्हणून अभ्यंग-स्नानाची प्रथा...
सचैल स्नान, धूत-वा कोरी-वस्त्रं, फराळ-नाश्ता...
अशी सुरु झाली,उत्सव साजरा करण्याची प्रथा...
आजतागायत जन-मानसात रुजली आहे कथा...

समाजातील छुप्या, अत्याचारी-दैत्यांना शोधून...
आजही गरज आहे, श्रीकृष्ण-सत्यभामा बनून...
अत्यंत-जरुरीचं-आहे छुप्या-नरकासुरांस-मारणं...
आवश्यक आहे, त्यांचा समूळच निप्पात करणं...

नरकासुर जसे बाह्य-जगातले, तसेच मनातलेही..
त्या सर्वांना हुडकून काढून नष्ट करणं, जमेलही...
कारण"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता गळे तेलही"
जर मनावर घेऊ तर सहजच उचलू मेरु-पर्वतही...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!