कविता – 🌷 “वाल्मिकी-रामायण,माणसांतर्गत”
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – रविवार २२ जानेवारी २०१७
नुसतं राम- राम म्हटल्याने पापांचे डोंगर नष्ट होतात …
पाप केलं मनानं, शरीरानं, हातांनी वा विचारांनी …
कसंही केलं तरी ते जमा होतंच जातं, अंतर्यामी …
वाल्या-कोळ्यानी केली पापं, पोटा-पाण्यासाठी …
माणूस करतो, कुटुंबासाठी-प्रेमापोटी-मजेसाठी …
पापांची वारूळंच्या-वारूळं उभी करतो, अंतरी …
जेव्हा-केव्हा त्याचे अंत:चक्षू उघडतात,
उपरती होते आणि तीच असते सुरवात …
सर्व-प्रथम तर कोणी ” राम राम” म्हणायला,
मनं-बुद्धी अन् जीभही नसते तयार वळायला …
अर्थात ” वाम-मार्ग ” सोडणं, सोपं नसतंच …
अट्टाहासाने जरी “मरा-मरा” असं विपरीतच,
“राम-नाम” घेऊन, वाल्याप्रमाणे नाम-जपलं …
तेच सन्मार्गावरचं पहिलं पाऊल, होऊ शकतं …
मग हळूहळू सुरु होतं, पापांच्या राशींचं वितळंणं,
तळमळ पारखून विधाता करतो पुढील मार्ग-दर्शन …
अंतर्स्थित गुरु करतो “प्रत्येक-वाल्याचं” रूपांतरण …
जन्म होतो, एका प्रगल्भ-बुद्धीच्या वाल्मिकी-ऋषींचा …
पूर्ण रूपांतरीत होऊन तारण्यास-अन्य मनुष्य-योनीला …
“रामायण” या सारखी एकमेव-द्वितीय-वाङ्मय-रचना,
निर्माण करुन उपकृत करतो तो संपूर्ण मानवी जगाला …
जोवर पृथ्वीतलावर माणूस-जात आहे अस्तित्वात,
तोवर महर्षी वाल्मिकी आणि त्यांचा रामायण-ग्रंथ …
यांचं माणसाला विस्मरण होणं, केवळ अशक्य-प्राय …
कारण ती-कथा, सदा-सर्वदा, वारंवार घडंतच राहणार …
संदर्भ, नावं, पात्रं, स्थळं, भूमिका खचितच बदलणार …
काळाच्या-कसोटीवर भक्कमपणे ती चिरंतन टिकणार …
मूळ-कथानक, विस्तार आणि अंत, हे त्रिकालाबाधित …
असं एक सत्य आहे, ज्यास मृत्यूही नाही शिवू शकत …
ज्याचा प्रचंड प्रयत्न करुनही, विसर नाही पडू शकंत …
जोपर्यंत आहेत चंद्र-सूर्य-तारका झळकत, आभाळात
तोवर”वाल्मिकी-रामायण”राहणार जिवंत, मना-मनात …
कायम-स्वरूपात, चिरकाल, प्रत्येक माणसा- माणसात …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷🙏
Leave a Reply