कविता - 🌷 "फिरुनी ताजी होई आठवण"
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १४ ऑक्टोबर २०१६
" नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा "
" मेरी आवाजही पेहेचान है, अगर याद रहे "
सदाबहार गाणं अन् गोड आवाज लताबाईंचा
असं समीकरण-नाट्यगीत = आवाज शशीचा
शाळेच्या रियुनियनचे, सगळे फोटो आठवले
शालेय मित्र-मैत्रिणींचे चेहरे नजरेसमोर आले
त्यात सर्वात आधी, शशी आठवली ...
सडसडीत बांध्याची, नाजूक नाकेली ...
माझ्या बेंचवर जास्त काळ बसलेली ...
जर का तिची जागा सरांनी बदलली,
हमखास समजा, शशी आता रुसली
तिची समजूत काढता, नाकी दम यायचा
एरव्ही फारच समजूतदारपणा असायचा !
शाळेच्या जवळ होतं तिचं घर,
पाणी प्यायला आम्ही गाठायचो तिचंच घर
नेहमीच तिच्या घरामधून आमच्या कानावर
पडायचे संगीताचे सुरेल सुस्वर
तिचे वडील फारच छान राग-दारी गायचे ...
जणू पं. राम मराठे गातात, असे वाटायचे
नाट्य-संगीत ऐकून, पायच खिळून जायचे ...
भान विसरुन सगळे गायन ऐकत रहायचे
शशी उपजतच खूप छान गायची,
बारीक आवाज पण गोड गायची
राग-दारीचं बाळकडू होतं घरातून,
समेवर सहज यायची ताना घेऊन
आजही एखादी नाट्यगीताची छान धुन,
फिरुनी ताजी करते, शशीचीच आठवण ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅
Leave a Reply