कविता – 🌷 ” परम-पावन करी मना ” तारिख – २२ डिसेंबर २०१६

कविता – 🌷 ” परम-पावन करी मना “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २२ डिसेंबर २०१६

शिवबाचे बालपणीचे सखे-सोबती-त्याच्या “स्वराज्य-स्वप्नाचे” साथी …
सर्व “मावळे”जीवाला जीव देणारे-जणू मैत्रीच्या नित-तेवणा-या-वाती …
उजळती लक्ष-लक्ष निष्ठेच्या-ज्योती-अनमोल रत्नं-हिरे-माणिक-मोती …
राजमुकुट जो शिवबाच्या भाळी, शूर-वीरांच्या शौर्याची त्यात झळाळी …

जिजाऊंनी कितीदा पाहिलेलं, शिवबाच्या मनावर बिंबवलेलं …
सुसंस्कारांची शिंपण केलेलं, स्व-राज्याचं सुरेख-सुंदर-स्वप्न …
शिवबाच्या एका इशाऱ्यावर, घेऊन पंच-प्राण तळ-हातावर …
प्रत्येक मावळा शूरवीर गडी, लढण्यास तयार जणू हर-घडी …

जिजाऊंचा इशारा, माघ-वद्य-नवमीला जर”कोंडाणा” सर केला,
अत्याचार थांबून-आनंद पसरेल रयतेत, संतोष भवानी-आईला …
तानाजी मालुसरे बाल-सवंगडी-शिवबाचा, लढवैया भरवशाचा …
तानाजीच्या मोठया मुलाची- रायबाची ठरली होती लग्न-घटिका …
समजता जिजाऊंचा मानस, लग्न-सोहळा- त्यानी पुढे ढकलला…

निवडक तीस शूरवीरांना हाताशी घेऊन”टेहळणीला”आरंभ केला …
रात्रीच्या गडद अंधारात, उंच फेकून “यशवंती”नामक घोरपडीला …
पहिल्या फेरीस न चिकटता खाली आली-अपशकुन वाटला त्याला !
पुनः फेकल्यावर काम फत्ते-तानाजी व तीस-मावळे गड चढून गेले …
योजनेनुसार धुवांधार लढाई झाली-गाफील उदयभानावर केला हल्ला …
“हर हर महादेव”च्या जयघोषात, संपूर्ण कोंडाणा वीरश्रीनं दुमदुमला …
अवघ्या तीस-मावळ्यांनी शिर तळहाती घेऊन गनिमांचा काटा काढला…

इतक्यात उदयभान चालून आला, सत्तेच्या हव्यासांनं तो होता गुरफटला …
तानाजी चार-हिताचे शब्द बोलला-“स्वराज्यासाठी लढ” असं म्हणाला, 
चवताळून, तानाजीवरच घाला केला-घेरून त्या महापराक्रमी शूर-वीराला,
उदयभानानं कपटानं शिरच्छेद केला-वीर तानाजी लढतच धारातिर्थी पडला …
हे पाहून, घाबरून मावळे-थोडे गोंधळले-पण तानाजीचा भाऊ-सुर्याजीने,
वेळीच चेतविली त्यांची स्वामी-भक्ति, तेव्हा दाखविली त्यांनी संपूर्ण-शक्ती …
सुर्याजीने ठार केले उदयभानास-जणू मुजरा केला तानाजीच्या पंच-प्राणास …!
उजाडायच्या आत भगवा झेंडा कोंडाण्यावर फडकला-स्वराज्य-जयघोशात …!

झुंझार-तानाजीचा पावन-देह घेऊन, भाऊ सुर्याजी आला शिवबा-भेटीला …
शिवबास मित्र-शोक अनावर झाला,”गड सर झाला,पण माझा सिंह गेला” …
जीवा-भावाचा बालपणचा मित्र गेला-स्वराज्याचा एक दणकट खांब गेला …
प्राणपणानं लढून, कोंडाणा मिळवला-मराठे-पत-शाहीचा झेंडा फडकवला …

लिहिताना महान-वीराची-शौर्य गाथा, साश्रु नयन होती-ओघळती जल धारा …
सार्थ-अभिमानाने, उंच होई माथा-धन्य ते शौर्य-धन्य ती गौरवशाली वीरगाथा …
करुनी ऐशा कवना, धन्यता वाटे मना-वाचून-लिहूनही परम-पावन करी मना …
तानाजी मालुसरे, स्वराज्यासाठी हसत प्राणांची आहुती देणारा दुर्मिळ हिरा …
त्या अतुलनीय पराक्रमाला कोटी-कोटी प्रणाम करुनी, मानाचा त्रिवार मुजरा !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



























Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!