कविता – 🌷 ” जाणीव अज्ञानाची “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – १७ डिसेंबर २०१६
सर्वप्रथम एखाद्या अज्ञान बालका-परी,
कायमची एक जिज्ञासा, प्रत्येक गोष्टीची …
कालांतराने जसा-जसा थोडा-थोडा
अंतरीचा प्रकाश लागतो उजळायला …
प्रकर्षाने हेच वाटू लागे जाणवायला,
की काहीच येत नाही बरं, आपणाला …
अजून अधिक कालावधी लोटला …
सुरु होतंच ज्ञान-कण करणं गोळा …
मधमाशी-सम, जाऊन फुला फुला …
सूक्ष्म, तरलतम ” मधु ” करुनी गोळा …
मन मात्र सांगे, ज्ञानाच्या नावानं “भोपळा” …
अंतर्यामी ज्ञानार्जनाची तहान वाढतच जाई …
दश-दिशा हिंडून, मनापासून अभ्यास होई …
कित्येक मान्यवरांबरोबर, चर्चा-संवाद होई …
“काही येत नाही” यांची नव्यानं जाणीव होई …
अधिक खोलवर अध्ययन, वाचन- मनन…
दिन-रात ध्यास, विसरून सर्व भूक-तहान
करुनी ज्ञानार्जन, नि:संकोच, विनाअभिमान
फिरून कळून चुके, ” आपण शून्य-समान”…
जशीजशी प्रगती-पथावर पडत जाती पावलं,
स्वतःच्या “अज्ञाना”चेच उभे दिसे, उंच राऊळ …
जाणीव झाली, मुंगीपेक्षा लहान आहोत आपण …
हे विशाल-विश्वं, त्यातील आहोत एक रज-कण !
जेव्हा “प्रथम श्रेणी अडाणी “होतो, तीव्र इच्छा होती,
मिळो त्या ईश्वराला समजण्याची-उमजण्याची-शक्ती …
जेव्हा अल्प समज आली, वाढली आकलनशक्ती …
अन् अत्यंत प्रकर्षानं जाणीव झाली, की खरोखरी
स्वयं म्हणजे, शून्य-अति-अज्ञानी-य:कश्चित् व्यक्ति …
विचार बळावतो हेच असावं ” स्व-विश्वं-व्यापी ज्ञान “…
जे मिळवण्यास-उमजण्यास, आयुष्य तरी लागे किमान …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply