कविता 🌷 ‘ जाणीव ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, १९ जून २०२३
वेळ : ०८ वाजून ५४ मि.
असं का होतं माणसं गेली की,
त्यांची खरी ‘किंमत’ जाणवते
त्यांच्या ‘नसण्यानं’ होते बेचैनी
विचारानं मनाची घालमेल होते !
बेफिकीर वृत्तीनं वर्तमान जातो
जाताना सोबत सुखालाही न्हेतो
बंद डोळ्यांना जाणीवही नसते !
जेव्हा ती होते वेळ गेलेली असते !
कधी वाटतं ते मायाजाल असावं,
ज्यात भुरळ पडून भरकटत जावं
मन-तन गुरफटून भानही हरपावं !
जणू भूल पडून सर्वच धूसर व्हावं !
जन्मा-जन्मांची पुण्याई कामी यावी
सुखाने चक्क पायांशी लोळण घ्यावी
हुशार देखण्या पतीची साथ लाभावी
प्रेम-लाड-कौतुकाची बरसात व्हावी !
कुणा दुष्ट-काळ्याबेर्याची दृष्ट लागावी,
मोकाट जनावरा-समान वृत्ती पलटावी !
सारासार-बुद्धीही काम करेनाशी व्हावी,
चुकीची झापडं, गांधारी-सम गत व्हावी !
पश्चात्तापाने फारसं काही बदलत नाही
गेलेला सुवर्ण-काळ आणता येत नाही
झालेल्या चुकांची जाणीव जातच नाही
बेगडी-मुखवटा फार काळ टिकत नाही !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply