कविता :🌷 " चिरंतन प्रचिती "
कवयित्री: तिलोत्तमा विजय लेले
'मनाचे श्लोक' हा समर्थ रामदासांचा, जणू वाग्-यज्ञ
त्यामधील अमूल्य ज्ञानावीण, आपण सारेच अनभिज्ञ
'मन' हे रुपक वापरुन समर्थांचा मानवजातीस उपदेश
सुप्त-स्वाभिमान-जागृत-केला जगण्याचा-अचूक-संदेश
छत्रपतींच्या स्वराज्य-स्थापनेत त्यांचे योगदान खास
"ठकासी व्हावे महाठक"असे म्हणाले समर्थ रामदास
कैक पिढ्या तयार केल्या, गावो-गावी स्थापिले मठ,
शक्ती आणि बुद्धी वापरुन, हाणून पाडले शत्रूंचे कट
समर्थांची जरी साधी, रोखठोक, भक्तिपूर्ण शब्दरचना
उपदेशांमृतरुपी-सल्ला देते, सद्वर्तनाचा-लाख मोलाचा
कालातीत असं अनमोल ज्ञान अन् अचूक मार्गदर्शन,
शेकडो वर्षे होऊनही मूढ-मनास आजही देते संजीवन
'प्रपंच करावा नेटका' या त्यांच्याच प्रसिद्ध उक्तिनुसार,
प्रपंच व परमार्थ यांची सांगड घालण्याचा, केला प्रचार
सारासार विवेक, सद्विचार आणि सद्वर्तनी सदा आचरण
स्वाभिमानाने जगण्यासाठी अत्यावश्यक असं पथ-दर्शन
वास्तव्य सज्जनगड, स्वराज्य-मोहिमेच्या तालिमी नाना
कायम भक्ति अन् शक्ती दोन्हींची सम-समान आराधना
'जगी सर्व सुखी असा कोण आहे' या प्रश्नाचं चोख उत्तर,
समर्थांनी मनास संबोधून पूर्ण मानवजातीस केलं निरुत्तर
जरी १६८२ ला समर्थ-रामदास पंचतत्वात विलीन झाले,
त्यांच्या 'समर्थ' शब्दांमधून ते कायम स्फूर्ती देतच राहिले
' मरावे परि किर्ती रूपे उरावे 'ही त्यांची एक प्रमुख उक्ति
त्यांच्या चिरंजीवी लेखनातून तिची, निर्विवाद येते प्रचिती
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply