कविता 🌷’ गहिवर ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : बुधवार, २६ जुलै २०२३
वेळ : दुपारचे १ वाजून १० मि.
माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण म्हणजे ‘गहिवर’
आतून जो मृत, त्याला फुटतंच नाही कधी पाझर !
अलिकडे माणसं यंत्रवत-कोरडी का बरं होत आहेत ?
स्वार्थापोटी आतल्या-आतच आकसत जात आहेत !
कुणी कितीही-पोटतिडकीने सांगो फरक पडत नाही
त्यांची पंचेंद्रियं बंद म्हणून कानात काही शिरत नाही !
भावनाशून्य झाल्याने मन-बुध्दि-काया झालीय बोथट
सतत इर्षा-जीवघेणी स्पर्धा, काहीच नाही सर-धोपट !
स्वतःवरुन जगाकडे बघून सगळं वाटंत असावं काळं,
सरळ-स्वच्छ वागणूकीतही शोधत बसतात काळंबेरं !
स्वतःच्या नाकावरच मस्त बस्तान बसवू दिलेली माशी,
बिंब पाहून-आरसा कितीही धुवून पुसून, जाणार कशी ?
“आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं”-हे किती काळ ?
दिवस पालटल्यावर, कुठेच शिजणार नाही यांची डाळ !
सृष्टीच्या साम्रज्यात सगळीकडे आल्हाददायक हिरवळ,
ओझरता कटाक्ष टाकला तरी पळून जाते सारी मरगळ !
भू-स्वर्ग-पाताळ या कवि-कल्पना, मुळीच नाहीत भ्रामक
निस्वार्थाने-सत्कर्म-परोपकार केल्याने उभे राहते स्मारक !
दिवसा ऊन-पाऊस-थंडी-वारा झेलूनही पानं-फुलं-वृक्ष,
सपशेल गहिवरतात बघून एखाद्याचं दुःखीकष्टी-आयुष्य !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply