कविता :🌷’ एक सुखद-हमी ‘

कविता :🌷’ एक सुखद-हमी ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, २१ ऑगस्ट २०२३
वेळ : संध्याकाळी, ५ वाजून ११ मि.

“बालपण देगा देवा” असंच काहीसं, सदा-सर्वदा सगळ्यांचं मागणं !
खरं तर म्हातारपण हे देवानं मानवाला बहाल केलेलं दुसरं बालपण
सगळ्यांना नकोसं वाटतं आयुष्याच्या अखेरीस येणारं हे म्हातारपण  
प्रत्येकासाठी अबाधित सत्य एकच-जन्म-बाल्य-तरुण व वृद्ध होणं !

आयुष्यभराच्या चुकांच्या बोचर्या-जाणीवेने वृद्धत्व नकोसं होत असावं,
पश्चातापानं प्रायश्चित्त करावंसं वाटलं तरीदेखील ते तितकसं सोपं नसतं, 
वेळ गेलेली असते आणि विशेष काही करण्यास शरीर साथ देत नसावं !
वृद्धांच्या-प्रश्नांकडे लक्ष वेधण्या,’जागतिक-जेष्ठ-नागरिक-दिन’ सुरु झाला 
हा दिन जागरुकतेने वयोवृद्धांच्या सामाजिक-योगदानाची दखल घेण्याचा, 
या निमित्ताने त्यांचं कौतुक-प्रशंसा करुन-त्यांना मनोबल-आधार देण्याचा 
ज्यांनी निःस्पृहपणे योगदान दिले त्यांचा सुयोग्य मान-सन्मान करण्याचा !

पूर्वी वृद्धांची जबाबदारी असायची, महत्वाचे-कौटुंबिक-निर्णय घेण्याची 
त्यांना मान देऊनही-कुटुंबातील-सदस्यांना आदरयुक्त भीती असायची !
आता विभक्त कुटुंब पद्धतीत पूर्वीचं चित्र पालटून जणू दुसरं टोक गाठलंय् !
दुर्लक्षित स्थितीत एखाद्या स्वाभिमानीला मरणप्राय-नैराश्य वाटू शकतंय् !

आयुष्यात स्वाभिमानी-स्वावलंबींना देहाने व मनाने, वृद्धत्व ‘झुकवते’ !
इच्छा नसतानाही सतत लहान-सहान गोष्टींसाठी मदत घ्यावीच लागते,
मग काळाच्या-ओघात “आपण जरा मागे पडतोय” ही मानसिकता होते 
मानसिक-शारिरीक-दुर्बलतेच्या-वार्धक्याची ही हमखास खूणच असते !

जीवनाच्या संधीकाली त्यांच्या मूलभूत अपेक्षा सामान्य-माफक असतात 
घरातील सर्वांनी हसत-खेळत, सुखी-आनंदी राहावं इतकंच त्यांना वाटतं 
“हे देवा, मुला-नातवंडांना माझ्या वाट्याचंही दीर्घायुष्य दे” हेच ते मागतात
कोणी आजारी असलं की स्वतःला झोकून देत-देवाला साकडं घालतात !

नव-पिढीवर सुसंस्कार व्हावे,फुटकळ कारणांनी घरी वितंड-वाद न व्हावा
भांडणं करुन काही उत्पन्न न होता, हाती येतो अबोला-नात्यातील दुरावा !
आयुष्यात टक्के-टोणपे-कटु-अनुभवांनी त्यांना शिकविलेला असतो धडा,
आपल्या चुकांची पुनरावृत्ती मुलं-नातवंडांनी करु नये हीच असते सदिच्छा 
घरोघरी सगळेच लहानांशी शाळेतील गंमतींबद्दल आवर्जून गप्पा मारतात,
पण घरातील वृद्धांची विचारपूस न करता, त्यांना अधिकाधिकच टाळतात
अनावधानाने दुर्लक्षुन घरातील वडीलधाऱ्यांचं जणू अस्तित्वच नाकारतात 
याच वयोवृद्धांनी काडी-काडी जमवून घरकुल उभारलं ही गोष्ट विसरतात !

त्यांच्याशीपण वेळ काढून मनमोकळ्या गप्पा मारल्या तर काय बिघडलं ?
कारण ही ती व्यक्ती आहे जिने घरातील प्रत्येकासाठी जीवाचं रान होतं केलं 
ही तीच व्यक्ती आहे जिने रात्रीचा दिवस करुन घरा-दाराला होतं सांभाळलं …
ही ती व्यक्ती आहे जिने पोटाला चिमटा घेत लाड पुरवले-कोड-कौतुक केलं …

वृद्धत्वाने ना माणूस बदलंत, त्याचं कर्तृत्व-ऋण कणभरानेही कमी होत नाही 
आयुष्याची संध्याकाळ कुणालाच कधी चुकलेली नाही-पुढेही चुकणार नाही !
आजची तरुण पिढी भविष्यात म्हातारी होणार, ती टाळून टळणारी गोष्ट नाही 
आयुष्याच्या-खेळाची-गोम ही की आजचे तरुणही वृद्ध होणार कधी-ना-कधी !

वर्षातला एक दिवस ‘ज्येष्ठ-नागरिक-दिन’ म्हणून साजरा करणं चांगलंच आहे,
पण त्यापेक्षा कायमच, त्यांनी केलेल्या कामांचं-कष्टांचं चीज होणं गरजेचं आहे 
निदान तसा मन:पूर्वक-सक्रिय-प्रयत्न-अल्प-प्रयास करायला काय हरकत आहे ?
संधीकाली-जरुरीची, एक सुखद-हमी की “त्यांची काळजी करणारं कुणी आहे” !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆








 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!