कविता – 🌷 ” आप-पर-भाव “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २५ ऑगस्ट २०१६
झुंझु-मुंझु झालं आणि,
गोड साद आली कानी,
धुंद-मधुर त्या स्वरांनी …
काळजाचं झालं पाणी …
माध्यान्हीच्या शांत वेळी,
द्वाड कान्हा, शीळ घाली …
खट्याळ हरीच्या खोड्यांनी,
पुरती बावरली राधा-भोळी …
तीन्ही सांज होऊ घातली,
गायी-वासरे घरा परतली …
ऐकूनी कान्हाची मुरली,
सृष्टीही देहभान विसरली …
रजनीचा प्रहर काळा,
सावळाच तो घन-निळा …
राधेलाही विसर पडला …
आप-पर-भाव मिटला …
कोण ही राधा अन् कोण कन्हैया …
कोण देवकी, कोण यशोदा मैय्या …
कणा-कणात आहे, सुंदरसे स्वप्न
मना-मनात नांदे सदा राधा-कृष्ण …
राधा-कृष्ण गोपाल-कृष्ण…
राधा-कृष्ण गोपाल-कृष्ण…
युगानु-युगांपासून चालत आला हा खेळ …
प्रत्येक स्त्री-पुरुष जणू राधा-कृष्ण-मेळ …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply