कविता:🌷”चिरंतन युगपुरुष”


कविता : 🌷 " चिरंतन युगपुरुष "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

|| यदा-यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ||
|| अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ||

जन्मदाते-माता-पिता काळकोठरीच्या बंदिवासात
स्वतःचा सख्खा मामा ठार मारण्या टपला असता,
जन्मला, पूरग्रस्त स्थितीत तुफानी-वादळी-वा-यात
अनितीच्या-क्रौर्याच्या-हिंसेच्या-भयाण काळोखात...

म्हणूनच कदाचित्............

उभं आयुष्य श्रीकृष्णाने अन्याय समूळ नष्ट केला...
तान्हा असतां राक्षसी-वृत्तीच्या-पुतनेचा वध केला
बालवयातच कालियाचा, मातलेल्या कंस-मामाचा...
किशोरवयात, शंखासुर नावाच्या उन्मत्त दानवाचा...

गृहस्थाश्रमात पत्नी-सह, नरकासुराचा वध केला
हजारो पीडित महिलांना, सन्मान मिळवून दिला...
दयनीय अवस्थेतील द्रौपदीचा आधारस्तंभ झाला
बेफाम कौरवांना पराभूत करून अन्याय संपवला...

समाजातील अघोरी, दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट केला
"यदा-यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति"हा प्रत्यय दिला...
आदर्श जीवन कसे जगावे, सखोल, उपदेश दिला
हा मानवी जन्म कसा सार्थकी लावायचा, कथिला...

'श्रीमत्भगवद्गीता' या ग्रंथाचा उपहार बहाल केला
"न भूतो न भविष्यती" एकमेव, अद्वितीय विद्वत्ता...
कालातीत अत्युच्च कोटीच्या ज्ञानाचा हा खजिना
अनादि-अनंत कालापासूनचा हा मार्गदर्शक नमुना

आजही गरज आहे, श्रीकृष्ण-सत्यभामा होऊन ...
समाजातील छुप्या, अत्याचारी-राक्षसांना शोधून ...
अत्यंत-जरुरीचं-आहे छुप्या-नरकासुरांना-मारणं ...
आवश्यक आहे, त्यांचा समूळपणे निप्पात करणं ...

दानव-दैत्य जसे बाह्य-जगातले, तसे मनातलेही...
जागृक होऊन त्या सर्वांना नष्ट करण्या जमेलही...
कारण "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता गळे तेलही"...
ठामपणे निर्धारू, तर लीलया उचलू मेरु-पर्वतही...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!